रविवार – झाडं लावण्याचा दिवस

रविवार – झाडं लावण्याचा दिवस
जाणीव फाऊंडेशन करतेय निसर्ग संवर्धनाचे भरीव काम
मेळघाटच्या पायथ्याशी वसलेले धामणगाव गढी हे गावं. या गावातील राहुल नामक मेडिकल व्यवसाय करणाऱ्या मित्राच्या मनात सहज विंचार आला ‘ समाजाला आपलं हि काही देणं लागतं’ आणि यातूनच समविचारी मित्रांचा समूह तयार झाला. समूहाचे नामकरण म्हणजेच ‘जाणीव’ . जाणीव म्हणजेच समाजासाठी, चिमुकल्यांसाठी, पक्षी, प्राणीच नव्हे तर पर्यावरणाला हातभार लावण्याची.
या समूहात परदेशी अभियंता म्हणून काम करणारा अमोल, स्थानिक भागातील अमोल, डॉ.सचिन, डॉ.अमित, प्रथमेश, प्रतिक, अनिल, अजय,जितेंद्र यासारखे विशी,तिशी व चाळीशीतील मित्रपरिवार आहे. हे नावे केवळ प्रातिनिधिक आहे यात असंख्य मित्रांची पूर्ण नावे बाकी आहे. या जाणीव परिवाराने सुरुवातीला मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या भिलखेडा, जैतादेही, बुरडघाट ,धामणगाव गढी, कालापाणी, मनभंग, आडनद, मोथा सारख्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा दत्तक घेत येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व रोपटे पुरविले. यासाठी परदेशातील अमोल त्याच्या वाढदिवसाला न चुकता वीस हजार रुपये आवर्जून पाठवतो. शाळेतील विविध बाबींना सहकार्य केल्यावर जाणीवचा मोर्चा वळला तो निसर्गाकडे.
परिसरातील टेकड्या हिरव्यागार करण्याचा चंग जाणीवने बांधला. रविवार म्हणजे सुट्टी नव्हे तर ‘रविवार म्हणजे झाडे लावण्याचा दिवस’ ह्या टॅगलाईनखाली सर्व मित्रपरिवार एकत्र येतात. सुरुवातीला काहींनी टीका मस्करी सुद्धा केली. मुरमाड टेकडी हिरवीगार करणार म्हणून चिडवले सुद्धा. दोन वर्ष मेहनत करून टेकडी हिरवीगार झाली असतांना २०२२ मध्ये वनवणव्याने सर्व झाडे आगीत भस्मसात केली. थांबणार ती जाणीव कसली पुन्हा नव्या जोमाने धामणगाव पुढे शिवटेकडी लगत वड, पिंपळ, मोह, आंबा, जांभूळ, रिठा, आवळा सारखी देशी वाणाची रोपटे लावली. विशेष म्हणजे या साठी जोशी काकांनी रोपांची मदत केली. बाहेरगावच्या मित्रांनी आर्थिक सहकार्य केले तर गावातील स्थानिक मित्रपरिवाराणे अंगमेहनत घेतली. आज याचे फलित म्हणजे दोन टेकड्यावर सुमारे दीडशेदोनशे झाडे तग धरून मोठे होत आहे. आज या झाडांच्या सावलीत पक्ष्यांसाठी जलपात्र व अन्न पात्र लावले आहे. कधीकधी जंगलात बीजसंकलन तर रविवार म्हणजे झाडे लावण्याचा दिवस हा उपक्रम जाणीव सार्थकी करत आहे शिवाय समाजाला सुद्धा याची जाणीव होत आहे. म्हणून स्वराज्य प्रतिष्ठान सारखा समूह व ईतर अनेक हात मोठ्या जाणीवेने निसर्ग संवर्धनाचे काम जोमात करत आहे.